*या प्रकरणी सरकारने सभागृहात निवेदन करावे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी*
मुंबई, दि.१२ :
“मुंबईतील विधानभवन,मुंबई उच्च न्यायालय,बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी.”अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
” सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
औचित्याच्या माध्यमातून बोलताना वडेट्टीवार म्हणाले,हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागे कोणती शक्ती आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खलिस्तानी संघटनेचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. जर अशा महत्त्वाच्या ठिकाणांना उडवून देण्याच्या धमक्या येत असतील, तर हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“सध्या अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा या धमकीशी सबंध आहे का? आंतरराष्ट्रीय पातळीवर ताणले गेलेल्या संबंधांमुळे भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.गृहविभागाने या प्रकरणाचा तपास करून या ई-मेलचा उगम शोधून काढावा आणि यावर तातडीने सभागृहात निवेदन करावे.” अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.



















