*मुंबईचा विकास हवा, पण मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको.*
मुंबई, दि. १४ फेब्रुवारी ..
भाजपा महायुती सरकारमध्ये विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार प्रचंड बोकाळलेला आहे. सत्ताधारी भाजपा महायुतीच्या टक्केवारीचा खेळ मुंबईकरांच्या जीवावर बेतत आहे. इन्फ्रामॅन म्हणून पीआरगिरी करणाऱ्यांनी मुलुंड मध्ये बांधकाम सुरु असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळून झालेल्या घटनेची जबाबदारी घ्यावी. कारवाईचे नाटक करू नका, एमएमआरडीए व संबंधित खात्याच्या मंत्र्यांवरच कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपा महायुती सरकारवर तोफ डागली, त्या पुढे म्हणाल्या की, मुलुंड पश्चिम, एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या पिलरचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात काही एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. पण राज्य सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनाला त्याचे काही देणेघेणे नाही. मेट्रोचे काम सुरू असताना सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच दिसत आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? मेट्रोची कामं वेगाने होत आहेत, हे दाखवण्याच्या नादात त्याचा दर्जा आणि तांत्रिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे का? या घटनेची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न खासदार गायकवाड यांनी विचारले आहेत.
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सर्वसामान्य मुंबईकरांना जगणे कठीण झाले आहे. रस्त्यावर खड्डे, हवेत प्रदुषण, आरोग्याच्या सुविधा नाहीत, पिण्याचा पाणी नाही. विकास हा फक्त कागदावर व जाहिरातीतच दिसत आहे. मुंबईचा विकास झाला पाहिजे पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको.” असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.





















