*जिथे युतीमध्ये लढलो तिथे, महायुतीचा महापौर होणार -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
मुंबई
शिवसेना-भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले असून , मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
“ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे-जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल.” असेही त्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये महानगर निवडणुकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पुर्णविराम देत मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. “मुंबईच्या नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.” असेही ते म्हणाले.
यासोबतच ज्या-ज्या मनपांमध्ये शिवसेना-भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत,तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल.” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल.” असे त्यांनी सांगितले.


















