*महापालिका निवडणुकांची घोषणा झाली तरी, आम्ही ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले त्याचे काय? ओबीसींचे नुकसान होणार त्याला जबाबदार कोण*
*काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका*
मुंबई
“राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा झाली. या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे यांची युती असणार पण अजित पवारांचा पक्ष नसणार, हा महायुतीचा डाव आहे. सत्तेचा मलिदा खाताना अजित पवारांचा पक्ष चालतो पण निवडणुकीत काँग्रेसच्या सेक्युलर मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांचा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार महायुतीची ही रणनीती आहे हे जनतेला समजते.” अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
मुंबईत माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी महायुतीवर सडकून टीका केली. हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री करायचे त्यांच्याबरोबर चहा नाश्ता करायचा आणि निवडणूक आली की, नवाब मलिक यांचा मुद्दा पुढे करून युतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला दूर ठेवायचे हा दुटप्पीपणा आहे. निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला जवळ करायचे आणि मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांना स्वतंत्र निवडणूक लढवायला लावायची, महायुतीचे हे राजकारण लपून राहिलेले नाही. हिंदू विरुद्ध मुस्लिम केल्याशिवाय भाजप निवडणुका जिंकू शकत नाही म्हणून निवडणुका आल्या की, हा वाद निर्माण केला जातो.” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ % आरक्षण दिले असं भाजप सांगत होती. आता महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत.पण उद्या कोर्टात जाऊन पुन्हा ओबीसींच्या जागांवरील निवडणुका रद्द झाल्या,त्यांचे प्रतिनिधित्व कमी झाल तर ही जबाबदारी कुणाची? निवडणुका झाल्या तरी ओबीसींवर टांगती तलवार आहे त्यांच्या जागांवर वरवंटा फिरणार आहे.” अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतविभाजन होऊ नये आणि भाजपला त्याचा फायदा होऊ नये अशी भूमिका सर्वांची आहे. महाविकास आघाडी एकत्र राहणार का याबाबत स्थानिक नेते आणि पदाधिकारी निर्णय घेतील. स्थानिक नेते तिथली समीकरण पाहून निर्णय घेतील अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
ब्रह्मपुरी येथील शेतकरी शिवदास कुडे याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याप्रकरणी पोलिसाना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केल्याचे विजय वडेट्टीवर यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण समजल्यावर त्या शेतकऱ्याला मदत केली असून त्याला न्याय मिळावा म्हणून पोलिसांनी कारवाई करावी.” अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

















