*हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर घणाघाती टीका*
मुंबई,
“पश्चिम उपनगर जोगेश्वरीतील दोन झोप़डपट्टी पुनर्विकास प्रकल्पात हिंदूंची घरे मुस्लिमांना देण्याचे कटकारस्थान बिल्डरांनी रचल्याचा” गंभीर आरोप शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. ‘हाऊसिंग जिहाद’च्या माध्यमातून मुंबईतील डेमेग्राफी बदलण्याचा प्रयत्न बिल्डर करत आहेत”, असे निरुपम म्हणाले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निरुपम पुढे म्हणाले की,”जोगेश्वरी ओशिवरा येथे पॅराडाइज झोनमध्ये ४४ घरे होती, पुनर्विकासात ही संख्या ९५ पर्यंत वाढली. यात ५१ वाढलेली सर्वच्या सर्व घरे मुस्लिम व्यक्तींना देण्याचा प्रयत्न सुरु आहे. अब्दुल गनी किताबुल्लाह या बिल्डरच्या दोन्ही मुलांच्या नावे ३० घरे अलॉट झाली आहेत. हिंदुंची घरे मुस्लिमांनी खरेदी केल्याने आता संपुर्ण वस्ती मुस्लिमांची झाली आहे.” असा आरोप निरुपम यांनी केला.
‘”श्री शंकर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत’ ६७ घरे होती. यात केवळ ६ मुस्लिम कुटुंब होती, मात्र पुनर्विकासात घरांची संख्या १२३ झाली. यातील अतिरिक्त घरे मुस्लिमांना विक्री करण्यात आली आहेत. या जमिनीवर पुर्वी गणेश मंदीर होते, देवीच्या मंडपासाठी जागा होती, मात्र आता हे सर्व तिथून हटवले असून, तिथं मदरसा दिसत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणी एसआरएकडून चौकशी करण्यात आली आहे. मात्र हाऊसिंग जिहादची सखोल चौकशी करण्याची” मागणी निरुपम यांनी केली आहे.
निरुपम यांनी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर सडकून टीका केली. “काँग्रेस नेत्यांनी हिंदू दहशतवाद, सनातन आतंकवाद म्हणून हिंदू समाजाचा अपमान केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल गांधी यांनी वारंवार अपमान केला. हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे डीनर करणार का?” अशी खरमरीत टीका निरुपम यांनी उबाठावर केली. ते पुढे म्हणाले की, “काँग्रेस सरकारनेच भगवा आतंकवादाचे फेक नरेटिव्ह पसरवले होते. मालेगाव बॉम्बस्फोटात काँग्रेसने हिंदू कार्यकर्त्यांना विनाकारण गोवले होते. मात्र विशेष कोर्टाने या सर्व संशयितांना निर्दोष ठरवले. मुस्लिम तुष्टीकरणासाठी काँग्रेसकडून हिंदूंचा अपमान करण्यात आला, मात्र यापुढे हिंदू काँग्रेसच्या षडयंत्रात फसणार नाहीत”, असे निरुपम म्हणाले.
“चीनने भारताचा २००० चौरस किलोमीटरचा भूभाग गिळंकृत केला असा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी सरकारकडे यासंदर्भात पुरावे सादर करावे. राहुल गांधी यांनी देशाच्या सीमेबाबत, सुरक्षेबाबत बोलताना भान बाळगावे”, असा टोला निरुपम यांनी गांधी यांना लगावला.






















