*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची विधानसभेत मागणी*
मुंबई :- वाळवा तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांच्या नुकसान भरपाईबाबत कोणताही विचार होत नाही त्यामुळे सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवून वाळवा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केली.
याबाबत विस्तृत माहिती देताना जयंतराव पाटील म्हणाले की, २०२३-२४ साली ऐन पिक छाटणी घेतलेली असताना माझ्या वाळवा आणि आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसाने द्राक्षबागेचे प्रचंड नुकसान झाले. जवळपास २५० हेक्टर बाग बाधित झाली आहे. शासनाने याचे पंचनामे तर केले पण अद्याप कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नाही. यंदाही मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने द्राक्षबागांची काडीच तयार झाली नाही. त्यामुळे यंदा हजारो एकर द्राक्ष बागांना घड पडणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे असे ते म्हणाले.
हा गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी शासनाला मागणी केली की यात लक्ष घालून मागील नुकसान भरपाई तर द्यावीच त्याशिवाय यंदाचे ही पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशीही मागणी त्यांनी केली.






















