*अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड;अबु आझमीवर सरकारने कडक कारवाई करावी – आनंद परांजपे*
*महाराष्ट्राची भाषा ही मराठीच;मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल असा निर्णय महायुती सरकार कधीही घेणार नाही…*
*औरंग्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात कुठेही स्थान नाही;औरंगजेबाचे उदात्तीकरण कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही…*
मुंबई दि २३ जून – अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
आषाढी वारीला ८०० वर्षाची परंपरा आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक ओळख आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीवरुन पालखी निघते.संत तुकारामांच्या देहू येथूनही पालखी निघते. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. त्यावेळी मुस्लिम समाजाचे अनेक बांधव त्या वारीत सहभागी होतात आणि वारकर्यांना सेवा देतात याची आठवणही आनंद परांजपे यांनी अबु आझमी यांना करून दिली आहे.
कायम हिंदू – मुस्लिम राजकारण करुन अबु आझमी प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सरकारने करावी असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
*महाराष्ट्राची भाषा ही मराठीच;मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल असा निर्णय महायुती सरकार कधीही घेणार नाही…*
महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. त्यामुळे मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल अशाप्रकारचा निर्णय महायुतीचे सरकार कधीही घेणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भूमिका स्पष्ट केली.
आजच रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केंद्राकडून आलेली आहे याबाबतची एक बैठक ठेवली आहे. तो जीआर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून निघाला यामध्ये पहिली ते पाचवी महाराष्ट्रातील सर्व शाळांना मराठी हे अनिवार्य आहे. आणि तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा भारतातील कुठलीही भाषा घेऊ शकतो. २० विद्यार्थी जी भाषा घेतील त्यासाठी लागणारा शिक्षक घेणे ही त्या शाळेची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे मराठी ही भाषा महाराष्ट्राची आहे. अभिजात भाषेचा दर्जा हा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे हेदेखील विसरता कामा नये. राज्यसरकार मराठी भाषेविषयी संवेदनशील आहे असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.
*औरंग्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात कुठेही स्थान नाही;औरंगजेबाचे उदात्तीकरण कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही…*
छत्रपती संभाजी महाराजांना पकडून क्रूर पध्दतीने हालहाल करुन हत्या केली हा इतिहास महाराष्ट्र कधी विसरु शकणार नाही. त्यामुळे अशा औरंग्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात
कुठेही स्थान नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे
औरंगजेब हा क्रूर राज्यकर्ता होता. ज्याने आपल्या स्वतःच्या वडीलांना आठ वर्षे कैदेत ठेवले. राजगादीवर बसण्यासाठी आपल्या सख्ख्या भावांना ठार मारले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक आक्रमणे केली याची आठवण उदात्तीकरण करणार्या लोकांना आनंद परांजपे यांनी करुन दिली आहे.






















