“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू झालेला हा ऑनलाईन प्रयोग त्वरित थांबवा!”
— ॲड. अमोल मातेले, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार
दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला आणि अवघ्या सहा दिवसांत १९ मेपासून अकरावीच्या प्रवेशासाठी संपूर्ण राज्यभर ऑनलाइन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या मनस्थितीची आणि व्यवस्थेच्या तयारीची कोणतीही तजवीज न करता घेण्यात आला हे दुर्दैवी आहे.
पूर्वी फक्त ठराविक शहरांपुरती मर्यादित असलेली ऑनलाइन प्रक्रिया संपूर्ण राज्यभरात राबवण्याचा हा निर्णय कोणाच्या मागणीवरून घेण्यात आला? ही विद्यार्थ्यांवर थेट “डिजिटल अरेरावी” लादण्याची वृत्ती आहे.
राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणीच १६ मेपर्यंत पूर्ण झाली नव्हती, ऑनलाइन पोर्टलवर तांत्रिक अडचणी होत्या, आणि त्यातही १९ व २० मे रोजी झालेल्या सराव फेऱ्यांमध्ये विद्यार्थी अक्षरशः गोंधळले. काहींना लॉगिन होत नव्हतं, काहींना पर्याय दिसत नव्हते, तर काहींच्या फॉर्ममध्ये चुका होत होत्या. हे सगळं झालं तरी, वरून हे सांगितलं जातंय की ‘सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करू’.
हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा सरकारी उद्योग आहे. एकीकडे विभाग म्हणतो एक जुलैपासून कॉलेज सुरू करणार, आणि दुसरीकडे प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रकच ठरत नाही!
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामार्फत आम्ही शासनाला इशारा देतो की, हा अकार्यक्षम आणि विद्यार्थीविरोधी ऑनलाईन खेळ त्वरित थांबवावा, अन्यथा विद्यार्थी, पालक आणि युवक शिक्षण संचालकांना घेराव घालावा लागेल.
विद्यार्थ्यांचं करिअर ही तुमच्या प्रशासनाच्या चुका झाकण्यासाठीची ढाल नाही. त्यांच्या भावनांशी, भविष्याशी असा खेळ चालणार नाही



















