*मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, सकाळचा भोंगा संजय राऊत नाही*
*भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर*
*संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आणि भाजप द्वेषाची कावीळ झाली*
*७५ वर्षे वयानंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही आणि इतिहासही नाही*
*२०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प मोदींच्याच नेतृत्वाखाली पूर्ण होईल- बावनकुळे*
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून काय म्हटलंय पाहुयात
उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. 75 वर्षे वयानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही.
भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते आदरणीय अटलबिहारी वाजपेयी वयाच्या 79 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई (83 वर्षे) आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या 81 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही.
भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही.
२०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल.



















