*’दुर्गम भागातील कुपोषित बालकांना दर्जेदार आहार मिळावा यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे’; विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश!*
*नागपूर दि. १७* : महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कालपासून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज दि १७ रोजी विधानपरिषदेत बालकांच्या कुपोषणाचा विशेष उल्लेख करण्यात आला . ज्याची तत्काळ दखल उपसभापती महोदया डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली.
विधानपरिषद सदस्य श्रीमती उमाताई खापरे यांनी बालकांच्या कुपोषणाचा विशेष उल्लेख करून म्हणाल्या की, “राज्यात पुणे जिल्हा प्रगतशील समजला जातो मात्र, या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या महिन्यात कुपोषित बालके शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शेकडो मुले कुपोषित असल्याचे आढळले. यामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील आणि सहा वर्षांच्या पुढील बालकांचे कुपोषण रोखण्याची गरज असल्याचे आढळले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील तसेच राज्यातील सर्वच जिल्ह्यातील कुपोषित बालकांना कुपोषण मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.”
या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “उमाताई खापरे यांनी जो बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न मांडलेला आहे.या कुपोषित बालकांना अन्न वेळेवर मिळावं म्हणून सरकार अनेक योजना राबवत आहे. परंतु, नंदुरबार आणि पालघर दोन्ही ठिकाणी खराब अन्न दिल्यामुळे मुली व विद्यार्थ्यी आजारी पडल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बालकांचे कुपोषित असण्याचे प्रमाण आणि त्यामुळे नंदुरबार आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील घटनांकडे सुद्धा सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे.”
तसेच, शासनाच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वतीने शासन या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
















