केवळ १०० रुपयांत होणार दस्त नोंदणी
मुंबई,
मेट्रो प्रकल्प ३ मधील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महसूल विभागाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. या प्रकल्पबाधिकांना मिळणाऱ्या घरांच्या दस्त नोदंणीत मोठी सवलत देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या प्रकल्पबाधिकांना आता आपल्या मालमत्ता केवळ १ हजार रुपयांत नोंदविता येणार आहेत.सदर निर्णयामुळे मेट्रो प्रकल्प ३ मधील ३० इमारतींतील रहिवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
मेट्रो ३ ही मुबंईच्या पोटातून धावणारी पहिली भुमिगत मेट्रो मार्गिका आहे. ही मेट्रो कुलाबा ते वांद्रे- सिप्झ या मार्गावर धावणार आहे. या मार्गिकेवरील गिरगाव व काळबादेवी स्थानकामूळे एकूण ३० इमारती बाधीत झाल्या आहेत. या बाधीत इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत लि. मार्फत कायमस्वरुपी पुनर्वसन केले जात आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. ने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता हस्तांतरित करावयाच्या सदनिकांच्या दस्ताऐवजांवर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावर सुट मिळण्याची विनंती महसूल विभागाला केली होती.
त्यानुसार महसूल विभागामार्फत मुद्रांक शुल्क विभागाने मुद्रांक शुल्कात सवलत देण्याता प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे सादर केला होता. या प्रस्तावात मेट्रो ३ प्रकल्पातील गिरगाव व काळबादेवी स्थानकामुळे बाधित झालेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या व म्हाडामार्फत/ एमएमआरसी मार्फत पात्र ठरविण्यात आलेल्या रहिवासी/भाडेकरू/गाळेधारक इ. प्रकल्पग्रस्त व्यक्तींना घर/गाळे वाटप करताना करण्यात येणाऱ्या दस्तऐवजास लोकहितास्तव रु१००० रुपये इतके मुद्रांक शुल्क आकारून उर्वरित मुद्रांक शुल्क माफ करण्यास विनंती केली होती. त्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे मेट्रो प्रकल्प ३ मधील प्रकल्पग्रस्तांना आता केवळ १००० रुपये मुद्रांक शुल्क भरून आपल्या मालमत्ता नोंदविता येणार आहेत. यामुळे या प्रकल्पबाधितांनी महसूल मंत्री विखे पाटील तसेच मुद्रांक शुल्क विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.


















