Home मुंबई हक्क मागतोय महाराष्ट्र… म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची सरकारविरोधात मोहीम

हक्क मागतोय महाराष्ट्र… म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची सरकारविरोधात मोहीम

120
0

महायुती सरकारच्या गलथान कारभारांची चार्जशीट तयार, ती लोकांमध्ये मांडू

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

मुंबई :-

आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षातर्फे ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, आ. सुनील भुसारा, मा. आ. पांडुरंग बरोरा व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना जयंत पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे, ज्याने दिल्लीच्या तख्तालाही गुडघे टेकवायला लावले. या देशाच्या राज्यकारभाराचं पान हे या महाराष्ट्राशिवाय कधीच हललेलं नाही.
मात्र २०१४ पासून आलेल्या केंद्रातील मोदी सरकारमुळे आणि राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून असंवैधानिकपणे सत्तेवर आलेल्या महायुतीमुळे दैदिप्यमान महाराष्ट्राचं खच्चीकरण केले गेले असा गंभीर आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राला वाचवण्यासाठी हिरावलेला हक्क परत मिळवण्यासाठी एका नव्या जोशाने एकत्र यायचं आहे. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा जाज्वल्य इतिहास रुजवयचा आहे. तसेच महायुती सरकारविरोधात गलथान कारभारांची एक ‘चार्जशीट’ आम्ही तयार केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान राज्यातील जनतेचा आक्रोश दर्शवणारे “हक्क मागतोय महाराष्ट्र” हे गीत प्रसारित करण्यात आले. महायुती सरकारच्या महाराष्ट्रद्रोहाची मुद्देसूद माहिती देणारी माहितीपर पुस्तिका तयार करण्यात आली असून त्याचे वाटपही यावेळी करण्यात आला.

शेवटी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 70 30 12 00 12 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या, त्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल. त्यामधील www.hakkmagtoymaharashtra.com या संकेतस्थळावर क्लीक करून या मोहिमेत सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

*महाराष्ट्र मधील भाजपचे नेते घाबरले आहेत*

हरियाणा, जम्मू-कश्मीर मध्ये निवडणुका होत आहेत पण भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन बसण्याची वेळ आली आहे. म्हणजे महाराष्ट्र मध्ये किती मोठा खड्डा पडला आहे हे दिसते. २०२४ मध्ये तर आपण काही निवडून येणार नाही म्हणून २०२९ चे विधान नेत्यांकडून केले जात आहे असा टोमणा त्यांनी लगावला.

*उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा लाँग मार्च*

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या बुधवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गांधी पुतळा, मंत्रालय ते लाल बहादुर शास्त्री पुतळा असा लाँग मार्च काढला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here