Home दिल्ली *राज्यात दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या – हर्षवर्धन सपकाळ यांची...

*राज्यात दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या – हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी*

11
0

*राज्यात दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या – हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी*

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष *हर्षवर्धन सपकाळ* यांनी केली आहे.

नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले, “कुंभमेळ्यातील CCTV वर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला जात असताना मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चाही झाली नाही.”

*शेतकऱ्यांची अवस्था बिकट – सपकाळ यांचे मुद्दे:*

महाराष्ट्रात सर्वात मोठा हंगाम खरीपचा आहे. पावसाने दडी मारल्याने मोठा फटका बसला आहे. पेरण्या उशिरा झाल्या आणि आता एक महिन्यापासून पाऊस नाही. जे पेरले ते उगवले नाही व जे उगवले ते करपून गेले आहे.

कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत सरकारने पाऊल उचलायला हवे होते पण लक्ष दिले नाही. वीज गायब होत असल्याने जिथे पाणी आहे तिथेही पिकाला पाणी देता येत नाही. सरकारने आतापासूनच टंचाईचे नियोजन करावे, जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, एकही बळी जाऊ नये याची काळजी घ्यावी. केंद्राच्या निकषाने शेतकऱ्यांना मदत द्यावी.

*MPSC चा भोंगळ कारभार – अध्यक्ष, सचिवांनी राजीनामा द्यावा:*

राज्यातील लाखो विद्यार्थी, विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुले पुण्यात MPSC ची तयारी करत आहेत. पण पेपरफुटी व अनागोंदी कारभाराने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.

“औषध निरीक्षक परीक्षेचा घोळ ताजा असतानाच आता गट-क चा पेपर आधीच फुटल्याने परीक्षा रद्द झाली आहे. पेपरफुटी हा संघटित गुन्हा असून कठोर शिक्षा झाली पाहिजे. मागच्या काळातील भ्रष्टाचारातील व्यक्तींना वाचवण्यासाठीथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मित्र MPSC च्या अध्यक्षपदी बसवला आहे. अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत असून मुख्यमंत्र्यांकडून शून्य कारवाई होत असल्याची टीका सपकाळ यांनी केली.ट

*पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा:*

पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी खासदार पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. “हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनीच बाहेर आणले होते. आता न्यायालयाने प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार खासदार पार्थ पवार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे,” असे सपकाळ म्हणाले.

*वाचा सविस्तर: http://mai24news.in*

*#HarshwardhanSapkale #Drought #MaharashtraFarmers #MPSC #ParthPawar #Congress #MaiMedia24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here