राज्यात ६८३.५३ कि.मी. मेट्रो जाळ्याची उभारणी – उद्योग मंत्री उदय सामंत
१७४ कि.मी. मार्गावर प्रवासी सेवा सुरू
मुंबई, दि. २ : राज्यात एकूण ६८३.५३ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारण्याचे काम सुरू असून, त्यापैकी १७४ किलोमीटर मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधान परिषदेत नियम २६० वरील प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथे विविध मेट्रो मार्गांची कामे प्रगतीपथावर असून, राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
पुणे महानगरपालिकेत ११ गावांचा समावेश झाल्यानंतर त्या भागांच्या सर्वांगीण विकासाबाबत शासन सकारात्मक आहे. हडपसर, शिवणे, आंबेगाव, फुरसुंगी आदी भागांचा नियोजनबद्ध विकास व्हावा, तसेच पुणे महानगरपालिकेच्या संपूर्ण हद्दीतील नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अटल सेतूवरील सुरक्षिततेसाठी समिती
अटल सेतू येथे घडणाऱ्या आत्महत्यांच्या तसेच अपघातांच्या घटना रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे. समितीच्या अहवालानुसार आवश्यक उपाययोजना व पुढील कार्यवाही केली जाईल, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
ठाणे रिंग मेट्रोबाबत कार्यवाही
ठाणे परिसरातील प्रस्तावित रिंग मेट्रो प्रकल्पासंदर्भात लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर शासन विचार करून आवश्यक ती कार्यवाही करेल, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.




















