*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान, विश्वासू सहकारी हरपला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*
पुणे, दि. १ जुलै – पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान, विश्वासू सहकारी हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
जालिंदर कामठे यांनी सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, कार्यनिष्ठा आणि जनसेवेची मूल्ये जपत पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण विकास, लोककल्याण आणि प्रशासनातील परिणामकारकतेला प्राधान्य देत उल्लेखनीय कार्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणात त्यांचा मोठा सहभाग होता. लोकनेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. पक्षाच्या विचारांशी असलेली त्यांची निष्ठा, कार्यकर्त्यांशी जपलेला आत्मीय संवाद आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची त्यांची संवेदनशीलता सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक अनुभवी, निष्ठावान आणि समर्पित कार्यकर्ता गमावला आहे असेही सुनेत्रा अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
या दुःखद प्रसंगी कामठे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केली आहे.



















