*दिल्लीतील राष्ट्रवादी भवनमध्ये २७ वा वर्धापन दिन साजरा…*
नवी दिल्ली दि. १० जून – आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केले… जे योगदान दिले आणि जी निष्ठा दाखवली, ती कधीही विसरता येणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेचा वारसा पुढे नेण्यासाठी दादांनी जे प्रयत्न केले, ते खरंच प्रेरणादायी आहेतच शिवाय त्यांचे विचार, त्यांचा मार्ग आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प करुया असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन दिल्ली येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करुन साजरा करण्यात आला.
आजचा हा वर्धापन दिन अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे, कारण आज आपल्या सर्वांमध्ये आपले आदरणीय दादा नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत हा दिवस साजरा करताना त्यांच्या आठवणी मनात दाटून येतात असे सांगतानाच आजपर्यंत साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे सुनेत्रा अजित पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, युवा नेते खासदार पार्थ पवार,राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आदींसह पक्षाचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते.















