Home दिल्ली *इंडिया आघाडी गलितगात्र; विरोधकांचे मनोबल खच्ची” एकनाथ शिंदे*

*इंडिया आघाडी गलितगात्र; विरोधकांचे मनोबल खच्ची” एकनाथ शिंदे*

8
0

*”मोदींवर टीका करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल” : शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल*

*फेसबुक लाईव्हवरून उद्धव ठाकरेंवर शिंदेंचा अप्रत्यक्ष घणाघात*

नवी दिल्ली, ता. ८ : इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या नेतृत्वावर आणि एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “विरोधकांचे मनोबल पूर्णपणे खच्ची झाले असून इंडिया आघाडी गलितगात्र अवस्थेत पोहोचली आहे,” असा घणाघाती आरोप करत त्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नसून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचे राजकारण सुरू असल्याचा दावा करत शिंदे यांनी आगामी काळात मोदींचे नेतृत्व अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

दिल्लीमध्ये देशातील २० राज्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. देशभरात शिवसेना संघटन वाढविण्याबाबत राज्य प्रमुखांशी सविस्तर चर्चा झाली असून पक्ष विस्तारासाठी सकारात्मक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीमुळे शिवसेनेला नवी ताकद मिळेल आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षांना देशाची प्रगती सहन होत नसल्याचा आरोप करत शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने पुढे जात आहे. मात्र विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नसल्याने ते सातत्याने मोदींवर टीका करण्याचे काम करत आहेत. देशाची प्रगती आणि जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा त्यांच्या पचनी पडत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना शिंदे म्हणाले की, देशभर बैठका घेतल्या जात असल्या तरी त्यामागे ठोस दिशा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करतील, कारण त्यांना १४० कोटी भारतीयांचा आशीर्वाद आणि विश्वास लाभला आहे. राहुल गांधींनी आधी स्वतः सातत्याने देशात राहून काम करून दाखवावे, त्यानंतरच मोदींवर टीका करावी, असा टोला त्यांनी लगावला.

ज्येष्ठ नेते शरद पवार ममता बॅनर्जी या नेत्यांनी देखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या सातत्याबाबत प्रश्न उपस्थित केले असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, देशात असताना आणि देशाबाहेर गेल्यानंतरही पंतप्रधानांची बदनामी करण्याचे राजकारण सुरू आहे. ही कसली देशभक्ती आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

इंडिया आघाडीच्या बैठकीपासून काही महत्त्वाचे नेते दूर राहिल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पूर्वी सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करणारे नेतेच आता या बैठकापासून दूर राहत आहेत ते फेसबुक लाईव्ह पुरते येतात, असा जोरदार टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. पराभवाची भीती आणि आघाडीतील अंतर्गत मतभेद यामुळे अनेक नेते अस्वस्थ झाल्याचा दावा त्यांनी केला.

काँग्रेस छोट्या पक्षांना संपविण्याचे काम करत असल्याचा आरोप करताना शिंदे म्हणाले की, महायुतीचे गठबंधन हे विचारधारेवर आधारित आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले आहेत. याउलट काही पक्ष केवळ सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आल्याचे त्यांनी म्हटले.

२०१४ पूर्वी देशात स्पेक्ट्रम, कोळसा, टू-जी आणि चारा घोटाळ्यासारखे अनेक भ्रष्टाचार झाले. मात्र २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही ठोस आरोप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे मोदींवर टीका करणाऱ्यांचे आरोप जनतेकडून फेटाळले जातील, असेही ते म्हणाले.
विरोधकांवर आणखी हल्लाबोल करताना शिंदे म्हणाले की, देशभक्तीची भाषा करण्याऐवजी काही विरोधक देशाच्या हिताविरोधात भूमिका घेत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये त्यांची विश्वासार्हता कमी होत चालली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना बढती आणि स्वतःला मुख्यमंत्री करण्याबाबत बच्चू कडू यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, त्या विधानाची माहिती घेऊनच ते बोलतील.

शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळेल. तसेच कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत विचारले असता, काही लोक पूर्वीच्या गोष्टी विसरून पुन्हा एकत्र येत असतील तर ती त्यांची बाब असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीवर टीका करताना शिंदे म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत त्यांच्या सरकारने प्रत्यक्षात दिली. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

राजेश एक्सपोर्ट प्रकरणातील कथित घोटाळ्याबाबत विचारले असता, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सरकार खपवून घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. यासंदर्भात सुनील तटकरे यांच्याशी चर्चा झाली असून मुख्यमंत्री स्तरावर अंतिम निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

नाशिकमधील राजकीय तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, गिरीश महाजन यांच्यासह उदय सामंत यांच्या बैठका सुरू असून स्वतःही या विषयावर संपर्कात असल्याचे शिंदे म्हणाले.

टीएमसी पक्षातील वीस खासदार फुटले आहेत याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. आम्ही महाराष्ट्र वाचविण्यासाठी निर्णय घेतला आणि जनतेच्या मनातील सरकार स्थापन केले. आज महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात असून सरकार राज्याला नवी दिशा देत आहे, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here