Home मुंबई *स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक...

*स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

17
0

मुंबई, दि. 26: शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त ‘त्रिवेणी’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 31 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकारी जीवनकार्याला, राष्ट्रनिष्ठ विचारांना आणि सामाजिक योगदानाला सांस्कृतिक अभिवादन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. संगीत, नृत्य, नाट्य आणि निवेदन या कलामाध्यमांच्या त्रिवेणी संगमातून सावरकरांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास आणि राष्ट्रभक्ती प्रभावीपणे उलगडण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारण्यात येणारे विशेष सादरीकरण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

सावरकर घराण्यातील महिलांची धगधगती जीवनगाथा दर्शविणारा हा नाट्य, नृत्य आणि निवेदनात्मक भव्य प्रयोग देशभक्ती, स्त्रीशक्ती आणि एकत्र कुटुंब व्यवस्थेच्या सामर्थ्याचा प्रेरणादायी मिलाप ठरणार आहे; तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील कौटुंबिक आणि भावनिक पैलूंनाही या कार्यक्रमात विशेष स्थान देण्यात आले आहे. यशोदा सावरकर, यमुना सावरकर आणि शांताबाई सावरकर यांच्या भूमिकांमधून सावरकर कुटुंबाने राष्ट्रासाठी दिलेले योगदान, त्याग, संघर्ष आणि समर्पण यांचे भावस्पर्शी दर्शन घडविण्यात येणार आहे. राष्ट्रकार्यासाठी झटणाऱ्या सावरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या या महिलांचे योगदान संगीत, नाट्य आणि निवेदनाच्या माध्यमातून प्रभावीपणे साकारण्यात येणार आहे.

यशोदा सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातून कुटुंबातील संयम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठ मूल्यांचे दर्शन घडविण्यात येणार असून, यमुना सावरकर यांच्या भूमिकेतून कठीण परिस्थितीतही सावरकरांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा आणि धैर्य अधोरेखित करण्यात येणार आहे. शांताबाई सावरकर यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचे योगदान आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणादायी बाजू रसिकांसमोर मांडण्यात येणार आहे.

प्रा. डॉ. प्रिती पोहेकर यांनी या कार्यक्रमाचे लेखन व निवेदन केले असून, संकल्पना व दिग्दर्शन राजश्री पोहेकर यांचे आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जागर करताना नव्या पिढीपर्यंत राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक मूल्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईतील सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, कलाकार आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ‘त्रिवेणी’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी सांस्कृतिक पर्व ठरणार असल्याची भावना सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी व्यक्त केली आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here