“बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांमध्ये प्रभावी बाजू मांडावी. तसेच महानगरपालिकेने गतवर्षी सुरू केलेली कनिष्ठ अभियंता पदाची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विधी खात्याने प्रयत्न करावेत.” असे निर्देश विधी समिती अध्यक्ष दिक्षा हर्षद कारकर यांनी दिले.
विधी विभागाच्या कामकाजाचा आणि माननीय न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांचा आढावा दिक्षा हर्षद कारकर यांनी दि. ९ एप्रिल रोजी विधी समिती दालनात घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. विधी विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
कारकर पुढे म्हणाल्या, “बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. परंतु, विविध खात्यांतर्गत अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने सेवा कामांवर ताण येत आहे. मागील वर्षी महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता पदाची भरती प्रक्रिया राबवली. परंतु, या पदासाठीच्या अर्हतेबाबत काही उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. तथापि, याबाबतची महानगरपालिका प्रशासनाची भूमिका माननीय न्यायालयात प्रभावीपणे मांडून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी विधी विभागाने ठोस प्रयत्न करावेत. जेणेकरुन, रिक्त असलेल्या अभियंत्यांची पदे लवकर भरली जातील आणि पर्यायाने नागरी सेवासुविधा अधिक प्रभावीपणे देण्यात मदत होईल.”असेही कारकर यांनी सांगितले.
***
















