मुंबई
जालना जिल्ह्यातील कडवंची शिवार येथे समृद्धी महामार्गावर १ एप्रिल रोजी झालेल्या भीषण अपघातात ८ महिला मजुरांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने पिकअप वाहनास दिलेल्या धडकेत हा अपघात झाला. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदनाद्वारे मृत व जखमी महिला मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियांवर मोठे संकट ओढवले असून त्यांना तातडीने आर्थिक सहाय्य मिळणे अत्यावश्यक आहे. तसेच जखमींना उत्तम वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक ती मदत व सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काळ आर्थिक मदत मंजूर करून प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, अशी विनंती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडूनही मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.


















