*निष्पक्ष चौकशीसाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा.*
मुंबई, दि. १३ फेब्रुवारी.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
मंत्रालयातील लाचखोरीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात लोकाभिमुख कारभार करण्यासाठी लोकांना सरकार आपले वाटावे यासाठी राज्य सरकारचे मुख्यालय असणा-या सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय करण्यात आले. पण महाभ्रष्ट भाजपा महायुतीने मंत्रालयाचे भ्रष्टाचारालय केले आहे. झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे, हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवळ यांनी मांडली आहे मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे.” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..


















