भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वाहिली आदरांजली
मुंबई
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘समर्पण दिनी’ भारतीय जनता पार्टी तर्फे प्रदेश कार्यालयात अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत त्यांना अभिवादन केले.
यावेळी चव्हाण म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले ‘एकात्म मानववाद’ तत्वज्ञान आणि राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान व स्मरण करण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्ता, नेता आणि पदाधिका-यांनी प्रत्येक बूथवर कार्यक्रम राबवून समर्पण दिनाचे महत्व आत्मसात करावे. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पंचसुत्री अंगिकारावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शलाका साळवी, पुण्याच्या नूतन महापौर मंजुषा नागपुरे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक,एकात्म मानववाद आणि अंत्योदय या विचारांचे प्रणेते होते. राष्ट्रसेवा, सामाजिक विकासाचा मार्ग दाखवणारे त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी होते. पं. उपाध्याय यांनी ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ चा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. राष्ट्र सर्वोपरि या भावनेने देशाला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी ते झटले. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी देश आणि पक्षासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण ठेवून त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने आपण सर्वांनी मार्गक्रमण करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असेही चव्हाण यांनी नमूद केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान सदैव स्मरणात राहील, अशी कृतज्ञ भावना चव्हाण यांनी व्यक्त केली.






















