*स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळीत कचऱ्याचे साम्राज्य; शिवसेनेकडून स्वच्छता मोहीम*
*खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या सूचनेनंतर शिवसेना ॲक्शन मोडवर*
*विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वात पाहणी व किनारा स्वच्छता*
*’स्वच्छ वरळी, सुंदर वरळी’ अभियान वर्षभर राबवणार*
मुंबई – स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर पक्षाचे पदाधिकारी ॲक्शन मोडवर आले असून, मंगळवारी सकाळी वरळी कोळीवाडा व समुद्रकिनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विधान परिषदेचे उपसभापती, सचिन अहिर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. हे अभियान एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर राबवले जाणार असल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले.
*नारळी पौर्णिमेच्या भेटीदरम्यान स्थानिकांनी मांडल्या समस्या*
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता. त्यावेळी रहिवाशांनी परिसरातील अस्वच्छता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या गंभीर समस्या खासदार शिंदेंच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शिवसेनेच्या पथकाने परिसराची पाहणी करून ‘स्वच्छ वरळी, सुंदर वरळी’ अभियानांतर्गत ही मोहीम हाती घेतली.
वर्षभरासाठी विशेष आराखडा अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले असून स्थानिक आमदारांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप सचिन अहिर यांनी केला. ते म्हणाले, “आज केवळ समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करून थांबणार नाही, तर वरळी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वर्षभराचा विशेष आराखडा तयार करून ही मोहीम सातत्याने राबवली जाईल.”
विरोधकांनी आरोपांपेक्षा मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करावे मतदार याद्यांमधून सुमारे दोन कोटी नावे वगळल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर उपसभापती अहिर यांनी कडाडून टीका केली. “एसआयआर प्रक्रिया सुरू असताना विरोधकांचे बीएलओ काय करत होते? केवळ बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहावे आणि ज्या नागरिकांची नावे वगळली गेली आहेत, ती पुन्हा समाविष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करावेत,” असा सल्लाही त्यांनी दिला.






















