*मुंबईत आंदोलन करण्यास हुकूमशाही भाजपा सरकारकडून बंदी! आंदोलनास मज्जाव करणारा फतवा तात्काळ रद्द करा – खा. वर्षा गायकवाड यांची मागणी*
*मुंबई, दि. 26 ऑगस्ट:* भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोकशाही व्यवस्थेने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे पण मुंबईत आंदोलन करण्यावर भाजपा महायुती सरकारने बंदीच घातली आहे. आंदोलन करायचे असल्यास फक्त आझाद मैदानावर व तेही एकच दिवस करण्याचा फतवा काढला आहे. भाजपा सरकारचा हा फतवा तुघलकी कारभाराचा नमुना असून तो तात्काळ रद्द करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
भाजपा महायुती सरकारच्या निर्णयावर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, भाजपा सरकार हे फक्त मुठभर लोकांसाठी काम करत असून लाडके उद्योगपती व कंत्राटदार यांच्यासाठी सर्व नियम व अटी बदलून त्यांच्यासाठी पायघड्या घालते पण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष करते. भाजपा सरकारला कशाची भीती वाटते म्हणून त्यांनी मुंबईत आंदोलन करण्यास मज्जाव केला आहे.
भारतात लोकशाही आहे व सरकार संविधानाने चालते. कोणाच्या लहरी वा मनमानी पद्धतीने कारभार चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी परवाच नागपूरच्या एका कार्यक्रमात संविधानामुळेच आपण मुख्यमंत्री झालो असे सांगितले पण त्यांचे सरकार व पक्ष संवैधानिक मूल्ये पायदळी तुडवत आहे.
मुंबईत फक्त आझाद मैदानात ठराविक दिवशी व ठराविक वेळेतच आंदोलन करण्याचा निर्णय हा लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रकार आहे. असा कोणताही प्रकार काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. सरकारला जाब विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सरकारने आंदोलनाला मज्जाव करणारा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
*- MAI MEDIA 24, मुंबई*
—
























