*MAI MEDIA 24 EXCLUSIVE |
*”जिंदगी ना मिलेगी दोबारा” – गोविंदा नागेश भोईरची १७ वर्षांची किंकाळी आणि कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारे नेते!*
*२० ऑगस्ट – वाढदिवस बेडवर, ऑपरेशन पुन्हा!*
भिवंडीचे गोविंदा नागेश भोईर. वय ४१. २० ऑगस्टला वाढदिवस. पण केक नाही, *स्पेक्ट्रम हॉस्पिटल, अंजुरफाटा, भिवंडी* येथे पुन्हा ऑपरेशनसाठी एडमिट झाल्याची बातमी समोर आली.
२००९ ते २०२६ – १७ वर्षे दवाखाना सुटत नाही. ४१ वर्षांच्या आयुष्यातील १७ वर्षे फक्त वेदनेत काढलीत.. तरीही बेडवरून हात जोडून सांगतायत –
*”दहीहंडी सण म्हणून साजरा करा, स्पर्धा म्हणून नको. जिंदगी ना मिलेगी दोबारा… गणपती बाप्पा मोरया!”*
असं ते म्हणतात. तेव्हा काळीज पिळवटून निघतं.
●घ्यायची काळजी काय? कोर्ट आणि सरकार काय सांगतं?●
हा फक्त सण नाही, हा आता कायदा आहे. प्रत्येक मंडळाने, आयोजकाने आणि नेत्याने हे पाळलेच पाहिजे –
*१. बॉम्बे हायकोर्टाचे आदेश (२०१४ आणि ०७ ऑगस्ट २०१७)*
– उंची *२० फूट (४ थर)* पेक्षा जास्त नाही.
*१४ वर्षाखालील* मुलाला थरात घेण्यास सक्त मनाई. हा बालकामगार कायदा भंग आहे, गुन्हा आहे. सुरक्षेशिवाय हंडी नाही. २. सुप्रीम कोर्टाचा आदेश (२०१६)*
– हायकोर्टाच्या २० फूट मर्यादेला सुप्रीम कोर्टाने दुजोरा दिला.
*३. सरकारचा सुधारित GR (११ ऑगस्ट २०१५ आणि त्यानंतरचे सुधारित GR)*
दहीहंडीला *’साहसी खेळ’* म्हणून मान्यता.
-खेळ म्हटल्यावर नियम आले –
– प्रत्येक गोविंदाचा *विमा (Insurance)* काढणे बंधनकारक.
– *हेल्मेट, चेस्ट गार्ड, सेफ्टी बेल्ट, गुडघ्याला गार्ड* अनिवार्य.
– खाली *सुरक्षा जाळी / मॅट* अनिवार्य.
– प्रशिक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका सज्ज ठेवणे.
गोविंदांना सरकारी नोकरीत ५% आरक्षण आणि प्रो-गोविंदा नोंदणी.
●४. अवमान याचिका का आली?●
सरकारने कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊनही नियम पाळले गेले नाहीत, म्हणून सामाजिक कार्यकर्ते व्यंगचित्रकार*प्रशांत आष्टीकर* यांनी *अवमान याचिका (Contempt Petition)* दाखल केली होती. ०६ सप्टेंबर २०१८ रोजी “दहीहंडीत आदेशभंग” म्हणून बातम्याही आल्या होत्या.
*मग राजकीय नेते कसे वागतात?*
कोर्ट उंंई २० फूट सांगतं, GR विमा सांगतो, पण प्रत्यक्षात काय होतं?
तर नेते *लाखोंचं आमिष* – १ लाख, ५ लाख, ११ लाखाचं बक्षीस जाहीर करतात.
मग पथकं बक्षिसासाठी जीव धोक्यात घालून *९-१० थरांचे ५० फूटी मनोरे* लावतात.
हंडीच्या नावाखाली *डीजे, बायकांचा नाच, गुलालाची उधळण* – “गाई वाचवा आणि बाई नाचवा” हाच प्रकार.
हाच तर नागेश भोईर म्हणतोय – *”पिसाळलेल्या राजकारण्यांनी लाडक्या सणाची माती केलीय! आपलं वर्चस्व आणि लोकप्रियता सिद्ध करण्यासाठी आमचा जीव पणाला लावलाय.”*
श्रीकृष्णाने सवंगड्यांना दही-दूध वाटलं, हिसकावलं नाही. त्याने कधी ९ थर लावून बक्षीस मागितलं नाही.
*MAI Media 24 ची स्पष्ट मागणी -*
१. यंदा २० फूटाच्या वर हंडी लावणाऱ्या आणि १४ वर्षाखालील मुलांना घेणाऱ्या मंडळांवर आणि *बक्षीस जाहीर करणाऱ्या राजकीय नेत्यांवर* अवमान याचिका अंतर्गत गुन्हा दाखल करा.
२. गोविंदा नागेश भोईर यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारने उचलावा.
३. प्रत्येक हंडीच्या ठिकाणी सरकारी अधिकारी, विमा आणि सुरक्षा तपासणी अनिवार्य करा.
*४१ व्या वाढदिवशी संकल्प करूया -*
हंडी खाली आणा, सुरक्षा वाढवा. एकही नागेश भोईर पुन्हा घडू देणार नाही.
*बाकी तुम्ही समजदार आहातच!*
*- टीम MAI Media 24*
—






















