Home मुंबई *चेंबूर येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ एकसदस्यीय समितीमार्फत होणार सखोल चौकशी*

*चेंबूर येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ एकसदस्यीय समितीमार्फत होणार सखोल चौकशी*

11
0

*महापौर श्रीमती रितू तावडे यांच्यासह महासभेने अमान्य केला होता प्राथमिक चौकशी अहवाल, फेरचौकशी करण्याचे दिले होते निर्देश*

*त्यानुसार, फेर चौकशीसाठी वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ व माजी कुलगुरु प्रा. डॉ. संजय देशमुख यांची महानगरपालिका प्रशासनाकडून नेमणूक*

*एका महिन्यात समिती सादर करणार अहवाल*

चेंबूर परिसरातील डायमंड उद्यानाजवळ एका शाळकरी बसवर दिनांक ३० जून २०२६ रोजी दुपारी पिंपळाचे जुने आणि मोठे झाड कोसळून ओढवलेल्या दुर्दैवी घटनेत विहान श्रीवास्तव (वय ११ वर्षे) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले. महापौर रितू तावडे व महासभेने दिलेल्या निर्देशानुसार, या दुर्घटनेप्रकरणी फेर चौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ तथा माजी कुलगुरु प्रा. डॉ. संजय देशमुख यांची एकसदस्यीय समिती म्हणून नेमणूक केली आहे. या त्रयस्थ समितीने एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

चेंबूर येथील या दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रारंभी समिती गठीत केली होती. या समितीने सादर केलेला सविस्तर अहवाल मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे तसेच महानगरपालिका सभेने अमान्य केला होता. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सखोल तपास, सक्त कारवाई व कठोर दंडात्मक शिफारशींचा अभाव असल्याचे नमूद करुन महापौर तसेच महासभेने हा प्रारंभिक अहवाल अमान्य केला. तसेच त्रयस्थ व तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करुन फेरचौकशी करण्याचे निर्देशही दिले होते.

फेरचौकशीसाठी महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेले प्रा. डॉ. संजय व्ही. देशमुख हे वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी कांदळवने (मॅनग्रोव्हज्) बाबत भरीव कार्य केलेले आहे. तसेच, त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून देखील कार्य केले आहे. सध्या ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (मुंबई) येथे अधिवक्ता प्राध्यापक तसेच एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे उपाध्यक्ष पदावरही कार्यरत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव व कार्य विचारात घेऊन, त्यांची या चौकशी समितीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर एकसदस्यीय समिती खालील बाबींचा अभ्यास करुन आपला अहवाल एक महिन्यात सादर करेल.

१) प्राथमिक चौकशी समितीने वापरलेल्या कार्यपद्धतीचे परीक्षण

२) प्राथमिक चौकशी समितीने सादर केलेल्या पुराव्यांचे स्वतंत्र विश्लेषण

३) अभियांत्रिकी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण शास्त्र, जलनिःसारण, मलनिःसारण, रस्ता बांधणी, हवामान, मृदाशास्त्र व सार्वजनिक प्रशासन या दृष्टिकोनातून प्राथमिक चौकशी अहवालाचे चिकित्सक मूल्यमापन

४) प्राथमिक चौकशी निरीक्षणाचे वैज्ञानिक परीक्षण

५) घटनेच्या मूळ कारणाचे स्वतंत्र विश्लेषण

६) प्राथमिक चौकशी समितीने सूचविलेल्या अंतरिम उपाययोजनांचे मूल्यांकन

७) अहवालातील शिफारशींचे समीक्षात्मक परीक्षण

८) माननीय महानगरपालिकेस सादर करण्यासाठी स्वतंत्र अर्थबोधक मूल्यांकन अहवाल

९) भविष्यातील धोरणात्मक सुधारणा सुचविणे

या समितीस चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे, स्थळ भेटीच्या वेळी उपस्थित राहणे याबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांना निर्देश देण्यात येतील. समितीस अहवाल सादर करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य सर्व संबंधित विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाने नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here