मुंबई – विधानपरिषदेत आज सदस्य प्रमोद जठार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळी स्मारक बांधण्याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. लक्षवेधीच्या या चर्चेत सहभाग घेत भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी शासनाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी भूमिका घ्यावी, अशी विनंती केली.
आ. दरेकर म्हणाले कि, शासनाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी ५ एकरची जमीन दिली असून हे स्मारक व्हावे अशी सरकारची मानसिकता आहे. परंतु अनेक स्मारकं जाहीर होतात पण ते कालबद्ध वेळेत पूर्ण व्हायला हवे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. या स्मारकासाठी शासनाने पैशांची तरतूद करावी, जागा वाढवून देता आली तर द्यावी, वर्ष दोन वर्षात स्मारक उभे राहील अशी भूमिका शासनाने घ्यावी व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भक्तांना दिलासा द्यावा, अशी विनंती दरेकरांनी केली.
यावर मंत्री योगेश कदम यांनी म्हटले कि, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली त्या वाड्याची आम्ही पाहणी केली आहे. हे स्मारक होत असताना संभाजी महाराजांची जी कीर्ती आहे त्याला शोभेल असे स्मारक झाले पाहिजे. या वाड्याचे सदस्य असलेल्या सरदेसाई कुटुंबासोबत चर्चा झाली. ज्या ठिकाणी हा वाडा आहे त्याच ठिकाणी स्मारक झाले पाहिजे ही भावना आहे. हा प्रस्ताव विचाराधीन असून साडेतीनशे कोटींचा आराखडा तयार केला आहे. स्मारकासाठी वाढीव जागा मिळाली तर घेऊ, असेही मंत्री कदम यांनी आश्वस्त केले.
00000


















