Home Uncategorized किर्लोस “देव डाळपस्वारी २०२५” कोकणातील पारंपरिक “देव-डाळप” उत्सव – एक भक्तिमय सोहळा…*

किर्लोस “देव डाळपस्वारी २०२५” कोकणातील पारंपरिक “देव-डाळप” उत्सव – एक भक्तिमय सोहळा…*

129
0

*किर्लोस “देव डाळपस्वारी २०२५” कोकणातील पारंपरिक “देव-डाळप” उत्सव – एक भक्तिमय सोहळा…*
_- विजय लाड, किर्लोस आंबवणेवाडी_
————–
कोकणची भूमी ही निसर्गसंपन्नतेसह संतांच्या, साधू-संतांच्या आणि लोकदैवतांच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी दिवाळीनंतर, म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत संपूर्ण कोकणभर देवी-देवतांचे उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. या उत्सवांमध्ये जत्रा, दहीहंडी, पालखी, गावपळण आणि देव-डाळप यांसारख्या पवित्र परंपरांचा समावेश होतो. त्यातील एक अतिशय प्राचीन आणि भक्तिपूर्ण उत्सव म्हणजे “देव-डाळप”, जो तळ कोकणातील मालवण तालुक्यातील मुक्काम किर्लोस येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होतो.

या मंगल सोहळ्यात गावातील स्थानिक ग्रामस्थांसह शहरात वास्तव्य करणारे चाकरमानी देखील आपापल्या कुटुंबासमवेत मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. देव – डाळप उत्सवात देवाच्या खांबकाठींना सुरेख सजवले जाते. भव्य आणि भव्यदिव्य स्वरूपात वाजत-गाजत मिरवणुकीद्वारे त्या खांबकाठींना संपूर्ण गावभर फिरवले जाते. भक्तिरसात न्हालेल्या या सोहळ्यात भक्तांच्या “जय जयकार” घोषणांनी आसमंत दुमदुमून जातो. हा उत्सव केवळ श्रद्धेचा आणि भावनांचा संगम नसून, त्यामागे अनेक शास्त्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय कारणे दडलेली आहेत.

उत्सवाची शृंखला आणि भक्तिभावाने नटलेली परंपरा
हा पवित्र सोहळा सात ते आठ दिवस चालतो. देव आपल्या गर्भगृहातून प्रस्थान करतात आणि संपूर्ण गावाच्या सीमेवर वसलेल्या छोट्या-मोठ्या देवस्थानांना भेट देतात. ज्या ठिकाणी काही वेळ ते विसावतात, तेथे मोठ्या श्रद्धेने ओटी भरण्याचा विधी पार पाडला जातो. देवांचे आदरातिथ्य मोठ्या भक्तिभावाने केले जाते. याप्रसंगी गावातील न्याय व्यवस्थेला सुद्धा महत्त्व दिले जाते. गावात अवसरी व्यक्तींचे न्यायनिवाडे याच सोहळ्यात केले जातात. हे धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचे अनोखे उदाहरण आहे. तसेच, यात्रेत सहभागी असलेल्या यात्रेकरूंना या मुक्कामाच्या ठिकाणी थोडा वेळ विश्रांतीसाठी संधी मिळते. चहा-पानासारखी सेवा भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. नंतर देव ठरलेल्या स्थानकावर विसाव्यासाठी पोहोचतात. स्थानिक ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने त्या पवित्र भूमीची स्वच्छता करतात, तेथे रांगोळ्या काढतात, तो परिसर सजवतात. हा एक मोलाचा उद्देश या निमित्ताने पूर्णत्वास जातो.

पारंपरिक कला आणि सांस्कृतिक महोत्सव :
देव त्या ठिकाणी एक रात्र वस्ती करतात, आणि त्या रात्री विविध पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये भजन, कीर्तन, दशावतार नाट्यप्रयोग यांचा समावेश असतो. अशा प्रकारे कोकणातील समृद्ध पारंपरिक कलांना जपण्याचे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही या सोहळ्यातून साध्य होते. दुसऱ्या दिवशी सकाळी महाप्रसादाचा भव्य सोहळा संपन्न होतो. संपूर्ण गावातील भक्तगण मोठ्या श्रद्धेने प्रसादाचा लाभ घेतात आणि देव पुढील प्रवासासाठी प्रस्थान करतात.

सामाजिक आणि पर्यावरणीय योगदान :
उत्सवाच्या निमित्ताने गावातील प्राचीन वाटा, मार्ग यांची डागडुजी आणि स्वच्छता केली जाते. गावातील कुणी जर सार्वजनिक वाट अडवून ठेवली असेल, तर ती “देवाची वाट” म्हणून कायमस्वरूपी खुली केली जाते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण. देव वाजत-गाजत आणि मंगलमय वातावरणात जंगलातून मार्गक्रमण करत जातात. या दिव्य सोहळ्यामुळे जंगलातील हिंस्र पशु गावाच्या हद्दीपासून दूर पळतात, त्यामुळे शेतकरी, गवळी, वाटसरू आणि गुरे-ढोरे यांना अभय मिळते.
गावातील शांतता, ऐक्य आणि नव्या नेतृत्वाचा उदय
हा सोहळा गावकऱ्यांसाठी केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक ऐक्याची आणि बंधुभावाची खूण आहे. उत्सवादरम्यान गावातील तक्रारी आणि वाद मिटवले जातात. गावातील मुख्य मंडळी न्यायनिवाडा करत न्यायपूर्ण मार्ग काढतात.या सोहळ्यातून नव्या नेतृत्वाला देखील चालना मिळते. उत्सवाच्या नियोजनात सक्रिय असलेल्या तरुणांना गावातील प्रमुख मंडळींकडून प्रतिनिधित्वाची संधी मिळते. त्यामुळे भविष्यात नवे नेतृत्व उदयास येण्यास मदत होते.

उत्सवाचा समारोप :
ईडापिडा टळून मंगलमय वातावरणाचा संचार आठ दिवस चाललेल्या या भक्तिमय, मंगलमय सोहळ्यानंतर संपूर्ण गाव नवचैतन्याने भरून जाते. गावातील ईडापिडा टळते, संकटांचा नाश होतो आणि गावात आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण होते.

शेवटचे शब्द:
“देव-डाळप” हा उत्सव केवळ धार्मिक विधी नसून, सामाजिक एकता, संस्कृतीचे जतन आणि पर्यावरणपूरक उद्दिष्टांचा सुंदर मिलाफ आहे. हा पवित्र सोहळा गावकऱ्यांना एकत्र आणतो, न्याय व्यवस्थेस चालना देतो, गावातील प्रश्न सोडवतो आणि आपली पारंपरिक संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवतो.

_- विजय लाड, मुलुंड (पूर्व)_
_मूळ राहणार किर्लोस आंबवणेवाडी_

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here