*श्रीगणेशोत्सव कालावधीत मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार*
*- श्रीगणेशोत्सव २०२६ आढावा बैठकीत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची घोषणा*
*- श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्वंकष नियोजन*
*- महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी घेतला विविध प्राधिकरणांकडून तयारी कामांचा आढावा*
यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महापौर वैद्यकीय निधीतून मुंबईत ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली. तसेच या विशेष उपक्रमांतर्गत श्रीगणेश मंडळांच्या सभामंडपात श्रीगणेश भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार असून, यासाठी गणेश मंडळांनी आपल्या मंडपात की मंडप परिसरात या शिबिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले आहे.
‘श्रीगणेशोत्सव २०२६’ च्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका, श्रीगणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी, महानगरपालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात आज (दिनांक १ सप्टेंबर २०२६) महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर श्रीमती तावडे बोलत होत्या.
बैठकीस उप महापौर संजय घाडी, सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेता अमेय घोले, एआयएमआयएमचे गटनेताविजय उबाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेता यशवंत किल्लेदार, समाजवादी पक्षाच्या गटनेता अम्रीन अब्रहानी, सुधार समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोषी-सक्रे, बेस्ट समिती अध्यक्ष श्रीमती तृष्णा विश्वासराव यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सर्व परिमंडळांचे सह आयुक्त, उप आयुक्त, विविध विभागांचे अधिकारी, विविध प्राधिकरणांचे अधिकारी, पोलिस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी यांच्यासह बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेश उत्सव समन्वय समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघांसह विविध श्रीगणेशोत्सव समन्वय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापौर रितू तावडे म्हणाल्या की, ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या उपक्रमात श्रीगणेश मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. डोळ्यांची तपासणी करून ज्यांना गरज असेल अशा रुग्णांना चष्मा वाटप केला जाणार असल्याची माहिती महपौर श्रीमती रिते तावडे यांनी दिली. तसेच महिलांसाठी स्तनांच्या कर्करोगांचीही तपासणी केली जाणार आहे. ही सर्व आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार असल्याचेही श्रीमती तावडे यांनी सांगितले.
यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, मुंबईत श्रीगणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांसाठी वाहनतळांची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. गणरायाचे आगमन आणि विसर्जनादरम्यान कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी विविध विभागांनी घ्यावी. यावर्षी श्रीगणेशोत्सवात संपूर्ण बृहन्मुंबई विशेष मोहीम राबवून रस्त्यांवरील खड्डे, सिग्नलबाबत पाहणी करण्यात येणार आहे. श्रीगणेश भक्तांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. तसेच मुंबईतील श्रीगणेश मंडळांच्या गणरायाचे दर्शन घेण्यात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या भाविकांमध्ये महिलांची संख्या अधिक असते. त्यामुळे महिलांसाठी हिरकणी कक्ष तसेच प्रसाधनगृह २४ तास खुले ठेवण्याचे निर्देशही महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले. विविध गणेश मंडळांनी केलेल्या सुचनेनुसार उप महापौर व इतर लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत मुंबईतील मुख्य विसर्जन स्थळांची पाहणी करणार असल्याचेही महापौर तावडे यांनी जाहीर केले.
या बैठकीत उप आयुक्त (परिमंडळ- २) तथा बृहन्मुंबई महानगरपालिका गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे महानगरपालिकेने आगामी गणेशोत्सवात केलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली. तसेच श्रीगणेश गौरव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांसाठीचा प्रवेश अर्ज लवकरच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सपकाळे यांनी दिली. मुंबईतील मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी श्री. सपकाळे यांनी केले.
*मूर्तिकारांना आतापर्यंत ८५८ टन शाडू माती, २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य*
पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत ८५८ टन शाडू माती आणि २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग मूर्तिकारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंडप परवानगीसाठी ऑनलाइन ‘एक खिडकी प्रणाली’ कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे आतापर्यंत १ हजार १३६ मूर्तिकारांना ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी परवानगी घेतलेल्या मंडळांना पुढील पाच वर्षांसाठी एकत्रित परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच सन २०२६ साठी दिनांक १ सप्टेंबर २०२६ पर्यंत १ हजार ८८५ सार्वजनिक श्रीगणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले असून, सदर अर्जांची पोलिस आणि महानगरपालिका स्तरावर छाननी सुरू असल्याचीही माहिती उप आयुक्त श्री. सपकाळे यांनी दिली.
*गणरायाच्या आगमनासाठी तयारी*
श्रीगणेशमूर्तींच्या आगमन व विसर्जन मार्गांवरही पूर्वतयारी करण्यात आली आहे. २८१ ठिकाणच्या अडथळा निर्माण करणाऱ्या केबल्स हटविण्यात आल्या आहेत. तर आगमन व विसर्जन मार्गावरील एकूण ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे आणि १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच ५१५ ठिकाणी वृक्षछाटणी करण्यात आली आहे.
*विसर्जनासाठी सज्जता*
श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी यंदा ४४ समुद्र किनारे तसेच जेट्टी, २३ नैसर्गिक तलाव आणि २८१ कृत्रिम विसर्जन स्थळे, अशी एकूण ३७८ कृत्रिम विसर्जन स्थळे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विसर्जन स्थळांवर १ हजार १९४ स्टील प्लेट, २३ जर्मन तराफा, ३४ क्रेन, ८५ रुग्णवाहिका, १० मोटरबोर, ४९८ निर्माल्य कलश, ३२६ निर्माल्य डंपर, २६१ स्वागत कक्ष, २२८ नियंत्रण कक्ष, ७५ निरीक्षण मनोरे, १ हजार १३२ जीवरक्षक, ६ हजार ५२ फ्लड लाईट/सर्च लाईट, ४८९ तात्पुरती प्रसाधनगृहे, ३ हजार ११८ मनुष्यबळ, ५७६ अधिकारी तसेच इतर स्वयंसेवी संस्था यावेळी कार्यरत राहणार आहेत.
*कृत्रिम तलावांची माहिती क्यू आर कोडवर*
नागरिकांना विसर्जन स्थळांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी कृत्रिम विसर्जन तलाव क्यू आर कोड आणि गुगल मॅपद्वारेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
*सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात*
माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजीच्या निर्देशांनुसार, जनहित याचिकेतील अंतिम निर्णय होईपर्यंत दिनांक २४ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानुसार ६ फूट उंचीपर्यंतच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक असून, त्यासाठी महानगरपालिकेने आवश्यक व्यवस्था केली आहे.
*महानगरपालिकेचे आवाहन*
सुरक्षित, पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि शिस्तबद्ध पद्धतीने श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.
***





















