*रस्त्यांवरील खड्डे निर्धारित मानके, शास्त्रोक्त पद्धती व गुणवत्तेच्या निकषांनुसार भरावेत*
*अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश*
मुंबई महानगरातील सुमारे १७०० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण प्रगतिपथावर आहे. या व्यापक उपक्रमामुळे यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. परिणामी, खड्डे बुजविण्यावरील खर्चातही मोठी बचत झाली आहे. महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी रस्ते विभागातील अभियंत्यांनी अधिक सतर्क आणि जबाबदारीने कार्य करावे. खड्ड्यांबाबत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे २४ तासांच्या आत निराकरण करावे. खराब झालेल्या रस्त्यांच्या भागांचे (Bad Patches) तातडीने पृष्ठीकरण करावे. परिमंडळनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांकडून रस्त्यांवरील खड्डे निर्धारित तांत्रिक मानके व शास्त्रोक्त कार्यपद्धतीचे पालन करून उच्च गुणवत्तेनुसार भरले जात आहेत याची खात्री संबंधित अभियंत्यांनी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. बीटनिहाय नियुक्त दुय्यम अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नियमितपणे दुचाकीद्वारे फेरी मारून रस्त्यांची सद्यस्थिती जाणून घ्यावी आणि आवश्यक त्या दुरुस्तीची तत्काळ कार्यवाही सुनिश्चित करावी, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.
पावसाळापूर्व कामांची प्रगती, तयारी आणि आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी रस्ते व वाहतूक विभागातील सहायक अभियंत्यांची बैठक महानगरपालिका मुख्यालयात संपन्न झाली. त्यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी विविध निर्देश दिले. उपायुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (रस्ते) मांतय्या स्वामी यांच्यासह अभियंते उपस्थित होते.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी / खड्डे मुक्त रस्ते असावेत यासाठी महानगरपालिकेने रस्ते काँक्रिटीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत, सुमारे १७०० किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्डय़ांची समस्या निश्चितच कमी होणार आहे. पर्यायाने खर्चातही बचत होणार आहे.
उपयोगिता वाहिन्यांसाठी खोदण्यात आलेले चर (Trench) तांत्रिक मानकांनुसार पुनर्भरण न झाल्यास पावसाळ्यात पाणी रस्त्याच्या संरचनेत झिरपते. त्यामुळे डांबरी रस्त्याची मजबुती कमी होऊन रस्ता उखडण्याची प्रक्रिया सुरू होते. ही बाब लक्षात घेता, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मास्टिकचा वापर करून एकदा भरलेला खड्डा पुन्हा उखडत नाही, याची हमी असते. त्यानुसार, रस्ते देखभाल करण्यासाठी महानगरपालिकेने परिमंडळनिहाय कंत्राटदार नेमले आहेत. त्यांच्या मनुष्यबळ, यंत्रसामुग्री आणि साहित्यसाठ्याचा अभियंत्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा. विशेषत: मास्टिक कुकर उपलब्धता, खड्डे बुजविण्याचे वेळापत्रक, मास्टिक कुकरची फेरी यांची सांगड घालावी. रस्त्यांवरील खड्डे निर्धारित तांत्रिक मानके व शास्त्रोक्त पद्धतीनुसार भरले जात आहेत याची काटेकोर खात्री करावी. खड्डे लहान आकाराचे असताना (६ इंच) भरावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले.
बांगर म्हणाले की, रस्ते अभियंत्यांसह महानगरपालिकेतील एकूण २२७ बीटसाठी (प्रत्येक निर्वाचन प्रभागनिहाय) प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ दुय्यम अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. या दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्टीक पद्धतीने तात्काळ बुजवावेत. दुचाकीवरून फिरून आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची पाहणी करावी. मध्यवर्ती यंत्रणा आणि विभाग कार्यालयामार्फत समन्वय ठेवून खड्ड्याच्या तक्रारी वेळेत मार्गी लावाव्यात. तक्रारींची वाट न पाहता खड्ड्यांची नोंद स्वतःहून घेत खड्डे बुजवावेत.
मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग (१८.६ किलोमीटर – मुलुंड ते शीव) आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग (२७.६ किलोमीटर- दहिसर चेकनाका ते माहीम) अशा दोन्ही द्रुतगती महामार्गांची जबाबदारी महानगरपालिकेकडे आहे. समवेत, पूर्व मुक्त महामार्गाची (१७ किलोमीटर) जबाबदारी देखील महानगरपालिकेकडेच आहे. या तिन्ही महामार्गांवर खड्डे राहणार नाहीत, याची पुरेपूर काळजी रस्ते विभागाने घ्यावी. मुंबईतील इतर शासकीय प्राधिकरणांनी देखील आपापल्या अखत्यारितील रस्त्यांचे योग्य परिरक्षण करावे, खड्डे तातडीने बुजवावेत म्हणून देखील महानगरपालिका प्रशासनाने पाठपुरावा करावा, असेदेखील श्री. बांगर यांनी नमूद केले.
*दोष दायित्व कालावधीतील (DLP) रस्त्यांवर खड्डे पडले तर अधिदान देऊ नये -*
याशिवाय, प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीत (DLP) असलेले रस्ते हे संबंधित नियुक्त कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादीत वेळेत तसेच विनामूल्य भरून घ्यावेत. हे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणताही मोबदला/अधिदान देऊ नये. कारण कंत्राट देतानाच त्यात परिरक्षण/देखभाल करण्याची अट समाविष्ट असते. याउलट जर दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांवर खड्डयांचे प्रमाण वाढले असेल तर दंडात्मक कारवाई करावी, असे स्पष्ट करत बांगर यांनी प्रकल्प रस्ते, दोष दायित्व कालावधीतील (DLP) रस्ते आणि बिगर दोष दायित्व कालावधीतील (Non DLP) रस्ते यांची सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले.
*‘MyBMC MARG’ वर रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा -*
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’ (Complaint Management and Redressal System) ही एकात्मिक तक्रार व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांनी तक्रार नोंदविताना खड्ड्याचे स्पष्ट छायाचित्र, अचूक स्थान आणि आवश्यक तपशील उपलब्ध करून दिल्यास संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करणे अधिक सुलभ होते. यामुळे खड्ड्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होणार आहे. रस्ते विभागातील अभियंत्यांनी खड्डेविषकय तक्रारींची योग्य दखल घेऊन तात्काळ प्रतिसाद द्यावा, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले.
***



















