Home मुंबई *अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करा*

*अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करा*

8
0

*मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे मुंबई महापालिकेला निर्देश*

मुंबई, दि. 18 जून
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मुंबई बाहेर न जाता मुंबईत समायोजन करा, शिक्षकांचे पगार बंद करु नका, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये सन २०२५-२६च्या संचमान्यतेनुसार अनेक शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत. दुसरीकडे बृहमुंबई महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शिक्षकांची लक्षणीय पदे रिक्त असल्याने खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे महानगरपालिका शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन करावे, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजू बंडगर यांनी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे केली होती.

याबाबत आज पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला असता यावेळी 1176 शिक्षक अतिरिक्त आहेत. अशा शिक्षकांना मुंबई बाहेर पालघर, रायगड, रत्नागिरी अशा लगतच्या जिल्ह्यात न पाठवता मुंबईत समायोजित करावे, अशी मागणी शिक्षक आघाडीने घेतली होती. तर ज्या शिक्षकांना मुंबई महापालिका शाळेत समायोजित केले जाईल त्यांचा पगार मुंबई महापालिकेने द्यावा, असे शासनाचे धोरण असल्याचे शिक्षण आयुक्तांनी मांडले. मात्र या शिक्षकांचा पगार महापालिकेतून देता येणार नाही कारण याबाबत गतवर्षी मुंबई महापालिकेने ठराव करुन अशा शिक्षकांचे समायोजन तात्पुरत्या. स्वरूपात करावे, असे धोरण ठरवले आहे. गतवर्षी महापालिकेने 533 शिक्षकांचे समायोजन केले होते.

तसेच कायमस्वरूपी केल्यास निवृत्ती वेतन आणि सेवाज्येष्ठता, शालार्थ आयडी असे तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतील, असे महापालिकेच्या उपायुक्त प्राची जांभेकर यांनी सांगितले.

तर याबाबत शासन निर्णय जो काढण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टता नाही. त्यामुळे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या बाबतीत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन या प्रकरणी सुसुत्रता येईल अशी कार्यपद्धती व निकष ठरवणारा सविस्तर अहवाल एक महिन्यात शासनाला द्यावा. त्यानंतर यापूर्वी काढलेल्या शासन निर्णयात सुधारणा करता येतील. दरम्यान, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सध्या अतिरिक्त ठरल्या शिक्षकांचे समायोजन मुंबई महापालिका शाळांमध्ये करावे, तसेच शिक्षकांचे पगार थांबवण्यात येवू नयेत, असे असे निर्देश पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here