*शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तातडीने विशेष अधिवेशन बोलवा*
*अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल*
*प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे*
मुंबई
शेतकर्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे बळीराजाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत जाहीर करा तसेच राज्य सरकार आता तरी ओला दुष्काळ जाहीर करणार का? असा प्रश्न राज्य सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, “गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे बळीराजाच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. बळीराजाने मोठया आशेने शेतात पीक पिकवले होते. मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.” तसेच शेतकऱ्याचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे. आता तरी राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का? असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी सरकारला उद्देशून केला.
शशिकांत शिंदे म्हणाले की, “मे महिन्यापासून ते आजपर्यंत राज्यात पावसाने थैमान घातले आहे.सततच्या पावसाने शेतीची मशागत शेतकऱ्यांना करता आली नाही , मात्र काही दिवसांनी पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी शेतीचे मशागत करत पेरण्या पुर्ण केल्या. शेतात चांगल्या प्रकारे पिक उगवले मात्र त्यानंतर पुन्हा सातत्याने दोन ते तीन दिवसांपासून पावसाने तैमान घातल्याने पीक पुर्णपणे पाण्याखाली गेले आहे. पिकवलेली पिक पावसाने पुर्णपणे नेस्तनाबूद केले आहे. ” असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.
पुढे शिंदे म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ‘ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा’ अशी मागणी या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली होती. मात्र ‘निकषात बसत नसल्याने ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही’ असं सरकारने सांगितले होते.
निकष बाजूला ठेवून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. सध्याचे महायुतीचं सरकार हे केवळ बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि उद्योगपती यांच्यासाठीच काम करत आहे. सरकारला बळीराजाचं काहीही पडलेलं नसल्याचं सरकारच्या कृतीवरून दिसून येत आहे.” असे शशिकांत शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या संदर्भात एवढ्या गांभीर्याचा विषय असतानासुद्धा राज्य सरकारकडून केवळ पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. पंचनामा केल्यानंतरही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही ,अशी परिस्थिती सध्या बळीराजाची आहे. त्यातच प्रिपेड मीटर व सोलर मीटर सक्तीमुळे बळीराजा पुर्णपणे उध्वस्त होत आहे. याबाबत राज्य सरकारने ताबडतोब तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.” असा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आला आहे.
यावर सविस्तर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की,”गेल्या दोन -तीन दिवसांत पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहाकार माजवला. शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाने सोयाबीन, कपाशी, धान इत्यादी पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पिकांना कोंब फुटली आहेत. अनेक तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. आता तरी सरकारने जाग व्हावं तसेच शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे.” अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.


















