देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमची दुसरी इनिंग सुरु आहे. आत्तापर्यंत आम्ही वारकऱ्यांसाठी सर्व काही करत आलोय. यापुढं ही आम्ही करत राहू. ‘नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन’ .
लाडकी बहिण योजनेबद्दल बरंच काय-काय बोललं जातंय. मात्र मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही प्रिंटिंग मिस्टिक वाले नाही” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्ताने समाधी मंदिरावर अकरा किलो सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याची सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजनाने झाली तर कलशाची पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमात ना. एकनाथ शिंदे बोलत होते.
“आळंदी हे महाराष्ट्रातील सोन्याचं पिंपळ आहे. या पिंपळाला दंडवत. वारकरी परंपरा मोठी आहे. ही परंपरा पुढं घेऊन जाण्याचं काम खूप मोठं आहे. माऊलींच्या भाविकांना फक्त आवाहन केलं गेलं अन बघता बघता २२ किलोचे सुवर्ण कलशारोहण झालं. वारकरी संप्रदायाला आवाज दिला की काय आश्चर्य घडतं हे आज आपण यानिमित्ताने अनुभवतोय. आम्ही दोघे (मुख्यमंत्री आणि मी) पांडुरंगाचे वारकरी आहोत . संत ज्ञानेश्वर महाराजांनी एकेकाळी काय भोगलं आणि आज त्यांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण झालं. मुख्यमंत्री आणि मला हे भाग्य लाभलं, आम्ही नशीबवान आहोत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं हे भाग्य आहे. ” असे एकनाथ शिंदे म्हणाले.


















