*नागरिकांची तिरंगा हाती घेऊन विहार क्षेत्रावर उत्स्फुर्त भ्रमंती*
निळ्याशार अरबी समुद्राची अथांगता, त्यातून उसळणाऱ्या चित्तथरारक लाटा, डोळ्याचे पारणे फेडणारे ‘विहार क्षेत्र’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा, अशा मनोहारी आणि देशभक्तीची ओतप्रोत भावनामय वातावरणात ‘धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ मुंबई किनारी रस्त्यावरील प्रशस्त ‘विहार क्षेत्र’ तसेच चार “पादचारी भुयारी मार्ग’ १५ ऑगस्ट २०२५ सायंकाळपासून जनतेसाठी खुले झाले.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावर महालक्ष्मी (पीयूपी) येथील भुयारी मार्ग क्रमांक ४ आणि वरळी (पीयूपी) भुयारी मार्ग क्रमांक ११ येथून विहार क्षेत्रावर आज सायंकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रशस्त विहार क्षेत्रावर आलेल्या नागरिकांना ‘राष्ट्रध्वज तिरंगा’ चे वितरण करण्यात आले. नागरिकांनीही हाती राष्ट्रध्वज घेऊन उत्स्फूर्तपणे भ्रमंती केली.
मुंबई किनारी रस्त्याची अद्वितीय भव्यता, विहंगमता आणि समुद्र किनाऱ्याच्या रम्य सान्निध्यात नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
***



















