सोलापूर, दि. 14 जून 2026 : माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे महामार्गालगतच्या विहिरीत पिकअप वाहन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात पंढरपूर तालुक्यातील काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
म्हसवड येथे देवदर्शन करून परत येत असताना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत सुरू असलेल्या बचाव व मदतकार्याचा आढावा घेतला. तसेच प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना मदतकार्य अधिक वेगाने राबविण्याच्या, जखमींना तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या तसेच आवश्यक सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमींच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
000 00



















