Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *”मी महापालिका शाळेचा विद्यार्थी ते उपमुख्यमंत्री”* *विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे एकनाथ...

*”मी महापालिका शाळेचा विद्यार्थी ते उपमुख्यमंत्री”* *विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे एकनाथ शिंदे यांचे आवाहन*

6
0

*”मी महापालिका शाळेचा विद्यार्थी ते उपमुख्यमंत्री”*

*विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे एकनाथ शिंदे यांचे आवाहन*

*शाळा प्रवेशोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून जुन्या आठवणींना उजाळा*

*शिक्षकांचा गौरव तर विद्यार्थांना जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याचा दिला मंत्र*

ठाणे, दि. 15 :

ठाणे महापालिका शाळा क्रमांक 23 येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळविण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आपणही याच महापालिका शाळेचे विद्यार्थी असल्याची आठवण सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित कार्यक्रमाला महापौर शर्मिलाताई पिंपळोदकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगरसेवक राम रेपाळे, संध्याताई मोरे, मुख्याध्यापक दीपक मोराळकर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार आहे. पहिल्या दिवसाचा उत्साह कायम ठेवत विद्यार्थ्यांनी हसत-खेळत आणि आनंदाने शिक्षण घ्यावे. शिक्षण ही केवळ नोकरीची नव्हे, तर चांगला नागरिक घडविण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षकांचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, आई-वडील जन्म देतात; मात्र विद्यार्थ्यांना आकार देण्याचे आणि संस्कार करण्याचे कार्य शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचे स्थान समाजात अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कारही द्यावेत, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींनाही उजाळा दिला. “मी याच शाळा क्रमांक 23 चा विद्यार्थी होतो. त्यावेळी शाळेची परिस्थिती वेगळी होती. आजच्या विद्यार्थ्यांना आधुनिक इमारत, चांगल्या सुविधा आणि उत्तम वातावरण मिळत आहे. मात्र परिस्थितीपेक्षा जिद्द आणि मेहनत महत्त्वाची असते,” असे सांगत त्यांनी आपल्या शिक्षकांच्या आठवणीही सांगितल्या.

महापालिका, जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये, असे आवाहन करत त्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर अनिल काकोडकर, अनेक मोठी व्यक्तिमत्त्वे अशाच शाळांतून घडल्याचे उदाहरण दिले. शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षकांची बांधिलकी महत्त्वाची असून शाळेच्या नावावरून भेदभाव करू नये, असेही ते म्हणाले.

मातृभाषेतील शिक्षण विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढविते, असे नमूद करत त्यांनी मैदानी खेळ, प्रार्थना, स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगितले. सध्या मैदानी खेळांचे प्रमाण कमी झाल्याची खंत व्यक्त करत मुलांनी मोबाईलच्या आहारी न जाता खेळ आणि अभ्यास यांचा समतोल साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानामुळे राज्यातील शाळांमध्ये मोठे बदल घडून आले असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील शैक्षणिक ओझे कमी करण्यासाठी तसेच शालेय पोषण आहारासारख्या विविध योजनांद्वारे शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांनी पहिल्या बाकावरील विद्यार्थ्यांपासून शेवटच्या बाकावरील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांकडे समान लक्ष द्यावे, त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करावी आणि सोप्या भाषेत अध्यापन करावे, असे आवाहन त्यांनी केले. “जो विद्यार्थी प्रश्न विचारतो तोच खऱ्या अर्थाने हुशार असतो. त्यामुळे काही समजले नाही तर शिक्षकांना निःसंकोचपणे विचारा,” असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

जिद्द, चिकाटी आणि कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत प्रगती करण्यासाठी प्रेरित केले. “उडान भरनी हो तो परों को मजबूत करो, सपने देखने से पहले आँखों को जागृत करो…” या प्रेरणादायी ओळींमधून त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा संदेश दिला.
यावेळी त्यांनी शाळेतील स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांवर विशेष भर देत महापालिकेच्या शाळांना अचानक भेटी देऊन कमतरता तपासण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
शाळांच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, शिक्षक आणि पालकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here